Thursday, 28 August 2008

सरणार कधी

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजुन जळते अंतर ज्योती
कसा सावरू देह परी?

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती आतून
मिटाय झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी

पावन खिंडीत पावन होऊन
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता तरी ?

असं वाटत नाही

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही

दु:खावर मी केली अश्शी मात,
हसता हसता दुखून आले दात,
आरसा म्हणतो हसणा-या बाळा, मी फसत नाही !

माझे जिणे भरभरलेले ढग,
पाण्याने या पोटी लागे रग,
देवाजी ची किमया हे पाणी कधी आटत नाही !

चालत रहाण्यासाठी जो हट्टी,
त्याची नेहमी खड्ड्यांशी गट्टी,
अस्सा मी प्रवासी त्याला गाव कधी भेटत नाही !

हाती येता कागद लिहीतो मी,
आपली आपण टाळी घेतो मी,
शब्दांनी या बेरड होता पान कधी फाटत नाही !

दुर्दैवाच्या दुर्दैवाते ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे,
कानी देते धमक्या ते हजार मी बधत नाही !

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही


- संदिप खरे